अफवांपलीकडील दादा

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी अजित दादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे हि सुप्त ईच्छा बोलून दाखवत आहेत. जनता देखील दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. अजित दादा तब्बल ४ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, मात्र मुख्यमंत्री पदाने त्यांना कायमच हुलकावणी दिली. दादांची काम करण्याची निराळी शैली ही कायमच माध्यम आणि सामान्य जनता यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. एखादे काम होणार असेल तर जंग जंग पछाडून दादा ते काम तडीस नेतात. तसेच एखादे काम होणार नसेल तर ते स्पष्ट शब्दात नकार देतात. उगाच इतर नेत्यांसारखी हवेत आश्वासने देणं दादांना पटत नाही.

विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यापासून दादा ऍक्टिव्ह मोडवरच आहेत. उपमुख्यमंत्री असतानाही दिवस रात्र ते अविरत काम करत होते. पण गेल्या आठवड्यात ते काही खासगी कामानिमित्त परदेशी गेले होते. यावरून महाराष्ट्रात गुऱ्हाळ उठले. काही काम नसलेले नेते ते नाराज असल्याचे माध्यमांमध्ये सांगू लागले. माध्यमांनी देखील यावरून बरीच चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. पण आता दादा पुन्हा आल्यानंतर त्यांनी याबाबतीत निर्वाळा दिला. आणि या सर्व गदारोळाबाबत नाराजी देखील व्यक्त केली.

मुळात एखादा नेता देखील माणूसच असतो हे लोकांच्या आणि माध्यमांच्या लक्षात येत नाही. त्यालाही भावना असतात, नातीगोती असतात. त्याचदेखील एक खासगी आयुष्य असते. पण या सर्वच विचार न करता काहीतरी धुराळा उडवायचा आणि त्यात आपण माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे. हा निव्वळ मूर्खपणा आहे.

दादांनी आजवर कधीच झाकली मूठ सव्वा लाखाची असा कारभार केला नाही. आतून एक बाहेरून एक असा दादांचा कारभार नसतो. आता बरेच जण बोलताना दादांना पहाटेच्या शपथविधीविषयी विचारतात. पण पहाटेचा शपथविधी समजून घेण्यासाठी विरोधकांना त्यांच्या निर्णयाकडे राजकीय तल्लखतेने पाहणे गरजेचे आहे. एक प्रकारची राजकीय समज ज्या माणसाला आहे त्याला दादांच्या या निर्णयामागचं गूढ आपोआप समजून येईल. दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक महत्वाचे नेते आहेत. शरद पवार साहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. पवार साहेब आणि दादा यांच्यामध्ये बाप-मुलासारखं नातं आहे. दादा आणि साहेब जे करतात त्यामागे दूरदृष्टी असते. ते दोघेही समजून घेण्यास विरोधकांना कैक काळ फक्त विचारच करावा लागतो. त्यांना समजून घेणे साधं काम नाही. दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचा अविभाज्य भाग आहेत आणि राहतील. विरोधकांनी काहीही गुऱ्हाळ ओकली तरी त्याचा परिणाम पक्षावर होणार नाही.