विकासपुरुष भाग ३

मनी आणि ध्यानी केवळ विकासाचा ध्यास असणाऱ्या व्यक्ती आजच्या घडीला फार कमी पाहायला मिळतात. किंबहुना अशा व्यक्तींशी गाठभेट होणं दुर्मिळ बनलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी १९९१ साली आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. विविध क्षेत्रात आपल्या कार्यशैलीची अमीट छाप सॊडणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एक असं रसायन आहे, ज्यात ऊर्जा भरभरून आहे. राज्याला प्रगतीपथावर नेऊन सोडण्यासाठी सदैव तत्पर असलेले ऊर्जावान अजितदादा. राज्यातील अनेक दुष्काळी भागांतील पाण्याची समस्या निवारणासाठी दादांनी उपसा सिंचन योजना यशस्वीपणे राबवली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला. 
शेतकरी कुटुंबाशी जुळलेली नाळ अजितदादा पवार यांना स्वस्थ बसू देत नाही. बळीराजाचं भलं कसं होईल यासाठी दादा सतत प्रयत्नशील असतात. महाराष्ट्राच्या तहानलेल्या व्याकुळ भूमीला हिरवा शालू नेसवण्यासाठी दुष्काळी भागात उपसा सिंचन योजना यशस्वी पद्धतीनं राबवून दाखवली. टेम्भू, ताकारी, म्हैसाळ, सिना माढा, पुरंदर, जनाई शिरसाई, विष्णुपुरी, धापेवाडा, सोंड्यायेळा यांसारख्या उपसासिंचन योजना महाराष्ट्रात राबवून अजितदादांनी कोरड्या भागांचा कायापालट केला. गावाशी, शेतीशी, मातीशी अजितदादांचा अतिशय जवळचा संबंध असल्यानं त्यांना बळीराजाच्या अडचणींची चांगलीच जाण आहे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर गतिमान करण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत. दरम्यान, ह्या उपसा सिंचन योजना डोंगरी आणि दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहेत. 
दुष्काळी व डोंगरी भागातील गावांना कायमस्वरूपी आणि शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सदैवच कार्यतत्पर राहिले. उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागास पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक निर्णय हे कृतीत उतरवले. टीकेच्या नावाखाली केवळ तोंडातुन वाफा काढणाऱ्या टीकाकारांकडे कृतिशील माणसं लक्ष देत नाहीत. अजितदादांच्या कामांना देखील नावं ठेवणारी बरीच मंडळी आहेत, परंतु त्यांच्या टीकेला प्रतिसाद देणं हे दादांच्या स्वभावात नाही. कामातून आपली योग्यता आणि धमक सिद्ध करून दाखवणारे अजितदादा यांचं प्रशासकीय कारभारावर आधीपासूनच कायम वर्चस्व राहिलं आहे. पाण्याशी निगडित अनेक योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. केवळ निर्णय देऊन बाजूला न होता त्यांनी संबंधित प्रकल्पात जातीनं लक्ष घालून ते काम दर्जेदार होईल, याची खबरदारी सुद्धा घेतलेली आहे.
अजितदादा विविध सहकारी, शैक्षणिक वित्तीय संस्था, नगरविकास संस्था, क्रीडा क्षेत्राशी निगडित संस्था आदींना प्रगतीच्या अनुषंगानं शक्य ती मदत करत आले आहेत. अशा पद्धतीनं मंत्री पद भूषवताना अजितदादा यांनी आपल्या अलौकिक दूरदृष्टीतुन महाराष्ट्रात अतुलनीय विकास साध्य केला आहे. ज्या संस्थांना आणि प्रशासकीय विभागांना दादांचं मार्गदर्शन लाभलं आहे; त्यांनी विकासाचे नवे नवे उच्चांक गाठले आहेत. अशा कार्यशील लोकनेत्याला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी बसण्याची संधी मिळाली तर नक्कीच हे राज्य विकासाच्या घोडदौडमध्ये अव्वल कायमच राहील, यात शंका नाही.